आज ज्ञानभाषा मराठी समूहातील Vrushali Gokhale यांनी, नवरसांवर चर्चा सुरु केली. दिवसभर सदस्यांनी आपापली मते मांडल्यावर शेवटी, गोपालराज कपाटे बुवांनी, लीळाचरित्रातील वीररसावर आधारित लीळा प्रस्तुत केली.
___________________________
___________________________
नवरसांच्या चाललेल्या प्रस्तुत विषयानुरुप वीररसाच्या संदर्भातील लीळाचरित्रातील एक विशेष प्रसंग
सर्वज्ञांच्या परिभ्रमणात सर्वज्ञांचा मुक्काम एळापुर (सांप्रत नाव वेरुळ लेणी ) याठिकाणी चार महिने होता. सर्वज्ञांचे वास्तव्य गावातील चतुर्विधाच्या मठात होते. सर्वज्ञांचे प्रतिष्ठाण (सांप्रतचे पैठण) येथील भक्त सारंगपंडीत व त्यांचे कटकीचे (कटक- राजधानी, त्याकाळची देवगीरी) मित्र गोपाळपंडीत हे दोघेजण सर्वज्ञांच्या दर्शनासाठी ऐळापुर या ठिकाणी आले. सर्वज्ञांची व गोपाळपंडीताची ही प्रथम भेट, ते सर्वज्ञांच्या समोर मोठ्या ऐटीत बसले सर्वज्ञांनी त्यांना प्रश्न केला "आपणास कवणा ठाइ परीचयो" म्हणजेच तुम्ही कोणत्या कलेत प्रविण आहात. त्यांनी सांगितले की मी पारधी विद्येचे थोडेफार ज्ञान आहे. सर्वज्ञ विचारतात की "काइ शास्त्राधार की उबेणे" म्हणजे अभ्यास केला आहे की ऐकीव ज्ञान आहे. त्यांनी सांगितले की मला ऐकीव ज्ञान आहे. सर्वज्ञ त्यांना म्हणतात की सावजाचा यावा ( सावजाचा यावा -शिकारीसाठी गेल्यावर शिकारी सावज आकर्षित होण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात त्याचे ज्ञान ) धुरेचा लाठु ( धुरेचा लाठु - सोबत्यांच्या अंगी विरश्री संचरण्यासाठी एक प्रकारचे उत्साहवर्धक बोल त्याचे ज्ञान ) म्हणुन दाखवा . त्यांनी सावजाचा यावा व धुरेचा लाठु सर्वज्ञांच्या समोर सादर केला पंरतु त्यात कोणत्याही प्रकारचा रस उत्पन्न झाला नाही. यावर सर्वज्ञ म्हणतात "पारधी तो काइ इतुकाची ?" मग मात्र ते शांत बसुन राहतात . सर्वज्ञांनी मग पारधी विषयाचे निरुपण सुरु केले . सर्वज्ञ सांगतात पारध्यांच्या प्रमुख चार जाती आहेत . जाड, वाड, कोड, कवतिक अश्या प्रमुख जाती तर यापैकी जाड पारधी हे रानडुक्कर हत्ती आदी प्राण्यांची, वाड पारधी हे वाघाची कोड पारधी हे हरणा रोहीया चितळांची मेंदडाची तर कवतिक पारधी ससेयांची तीतरांची लावेयांची मासेयांची यानंतर सर्वज्ञांनी सावजाचा यावा बोलण्यास सुरवात केली , आणि सर्वज्ञांच्या आवाजाच्या दिशेने सावज आकर्षित होउ लागले. ते पाहुन सर्वज्ञांच्या सन्निधानी आसणार्या बाईसा मुख्य करुन सर्व भक्तजण मठाच्या आतमध्ये पळून गेले समोर प्रतिष्ठित दरबारातील राणेराउत बसलेले होते तेही आपली बैठक सोडून पळण्याच्या तयारीत आले त्या नंतर सर्वज्ञानी धुरेचा लाठु म्हणावयास प्रारंभ केला आणि त्या ठिकाणी विररस प्रभवला दरबारी राणेराउतांचे हात तलवारी वर गेले यात नवल काय पण बाईसादी स्रीयानीही काठी हातात घेतली एवढा आवेश सर्वांच्या ठिकाणी उत्पन्न झाला यावर खजील झालेले गोपाळपंडीत सर्वज्ञांना म्हणतात 'हे देवा आजपर्यंत आम्ही हे ऐकलेलेच नव्हते त्यामुळे सांगण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही तेंव्हा देवा हे तुम्हीच सांगावे आणि तुम्हीच ऐकावे'.
No comments:
Post a Comment