महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना,
सह्याद्रीभर शुभेच्छा 💐💐💐
महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेकांनी मोलाचे योगदान दिले आहे. अनेकांची नावे आपल्याला माहित आहेत, अनेकांची माहित नाहीत, अनेकांची माहित असून देखील आम्ही ती मुद्दाम नाकारतो! आज महाराष्ट्र, देशात क्रमांक एकचे राज्य आहे, पण हे अव्वल स्थान असेच मिळाले नाही. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेकांनी आपले आयुष्य वेचले आहे.
गेले अनेक दिवस अशा सर्व शिल्पकारांची नावे शोधत आहोत पण तरीही, अनेक नावे या पोस्टमधून सुटली आहेत याची आम्हाला कल्पना आहे... अशा सर्व शिल्पकारांची माफी मागून ही पोस्ट शेयर करत आहोत..
यातील माहिती आंतरजालावरून घेतली आहे. विकिपीडिया, कौस्तुभ कस्तुरे यांच्या संकेत स्थळाची भरपूर मदत झाली, त्यासाठी त्यांचे आभार :
https://mr.wikipedia.org
http://www.kaustubhkasture.in/
______________________
🔴 श्री. चक्रधर स्वामी : (१२ वे शतक) : श्री चक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ, समाजसुधारक, व महानुभाव पंथाचे संस्थापक होते. महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक म्हणून मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. वैदिक परंपरेला नाकारून स्त्री-शूद्रांसह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात धर्मसुधारक होत. चक्रधरस्वामींच्या भक्तीच्या प्रेरणेतून जे साहित्य त्यांच्या भक्त व अनुयायांकडून निर्माण झाले त्यामुळे मराठी साहित्यपरंपरेत अतिशय मोलाची भर पडली आहे.
🔴 श्री. ज्ञानेश्वर महाराज : (जन्म : इ.स. १२७५ - समाधी : इ.स. १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक. योगी व तत्त्वज्ञ होते.. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभाव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तुत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.
🔴 संत निवृत्तीनाथ : निवृत्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ किंवा १२६८ असे सांगितले जाते : ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.
🔴 संत मुक्ताबाई : संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. परंतु त्यांचे स्वतःचेही स्वतंत्र अस्तित्व होते. त्यांनी रचिलेले ताटीचे अभंग हे त्यांच्या नावावर नोंदविलेले आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत.
🔴 संत सावता (जन्म:इ.स. १२५०; समाधी इ.स.१२९५) : ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.
🔴 संत नामदेव : (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व ब्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत. नामदेव हे ‘मराठी’ तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’ च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.
🔴 संत चोखामेळा (चोखोबा) (अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) : संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.
🔴 संत एकनाथ(१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. तिब्रह्म, ‘संत’पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ’ज्ञानाचा एका’ या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ. ज्या काळात कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला.
🔴 समर्थ रामदास (१६०६ - १६८२) समर्थ रामदास, जन्म-नाव नारायण सूर्याजी ठोसर (एप्रिल, इ.स. १६०८, जांब, महाराष्ट्र - इ.स. १६८२, सज्जनगड, महाराष्ट्र), हे महाराष्ट्रातील कवी व समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणार्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. राजकारण धर्मकारणात जाणीवपूर्वक अंतर्भूत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होते.
🔴 संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा, तुका, तुक्या) : हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.
🔴 गाडगे महाराज ( डेबूजी झिंगराजी जानोरकर १८७६-१९५६) : अज्ञान-अंधश्रद्धा निर्मूलन ,अस्वच्छता उच्चाटन या कार्यातून विशेष ओळख. गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा हे आवडते भजन रचले. अज्ञान,भोळ्या समजुती , अनिष्ट रूढी ,परंपरा, दूर करण्यासाठी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला .देहू, नाशिक, आळंदी, पंढरपूर येथे धर्मशाळा बांधल्या, गरीब जनतेसाठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अनाथ अपंग लोकांना अन्नछत्राची सोय केली.१९५२ रोजी गाडगे बाबा मिशन स्थापन करून शैक्षणिक संस्था आणि धर्मशाळा बांधल्या. १९३१ वरवंडे येथे प्रबोधनातून पशुहत्या बंद केली.
🔴 गुलाबराव महाराज (६ जुलै, इ.स. १८८१ – २० सप्टेंबर, इ.स. १९१५) हे महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत व मराठी लेखक होते. "भगवद्देह अनध्यस्त-विवर्त आहे, म्हणजे ज्ञानानंतर नाश पावत नाही" हा भक्तिसिद्धान्त शांकरतत्त्वज्ञानाच्या आधारावर मांडून त्यांनी मधुराद्वैत दर्शनाचा पुरस्कार केला. सांख्य-योगादी षड्दर्शने परस्परविरोधी नसून पूरक आहेत, असे त्यांनी वेळोवेळी संगितले. "भारतातील नानाविध धार्मिक संप्रदाय हिंदू, बौद्ध, जैनादी भारतीय धर्म आणि ख्रिस्ती, मुसलमानादी सर्व अभारतीय धर्म, वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहेत" असे विचार ते मांडत असत. डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचे तत्त्वज्ञान इ. पाश्चात्त्य विचारसरणी त्यांना मान्य नव्हती. शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करुन गुलाबराव महाराजांनी आपल्या अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात केलेल्या ग्रंथनिर्मिती केली.
🔴 तुकडोजी महाराज ( माणिक बंडोजी ईंगळे १९०९-१९६८) : अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन या कार्यात अग्रेसर. 1935 रोजी मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली.खंजिरी भजन हा त्यांच्या प्रबोधनाचे वैशिट्य होते. जपान सारख्या देशात विश्वबंधुत्वाचा संदेश प्रसारित केला. खेडेगाव स्वयंपूर्ण व्हावे या साठी 'ग्रामगीता' या ग्रंथातून उपाय योजले आहेत. ग्रामगीता, अनुभव सागरभजनवली, राष्ट्रीय भजनावली अशी ग्रंथसम्पदा. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचे खंजिरी भजन ऐकून त्यांना 'राष्ट्रसंत' म्हणून सम्बोधले.
__________________________
🔴 अनंत फंदी (१७४४-१८१९) : 'श्रीमाधवनिदान' या ग्रंठासोबतच अनंतफंदिंनी अनेक समाज प्रबोधनपर लावण्या लिहिल्या याशिवाय त्यांनी समाजात चांगल्या गोष्टी रुजवण्यासाठी आणि समाजाल जाग्रून करण्यासाठी 'कटाव' आणि 'फटका' हे काव्यप्रकार निर्माण केले.
🔴 बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (जानेवारी ६, इ.स. १८१२; पोंभुर्ले, महाराष्ट्र - मे १८, इ.स. १८४६) हे मराठी भाषेतल्या आद्य पत्रकारांपैकी एक पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी जानेवारी ६, इ.स. १८३२ रोजी सुरू केले. मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकवताना, समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे एतद्देशीय समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंताग्रस्त असत. समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले. या जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. त्यांचे विचार प्रगमनशील होते. ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली.
🔴 तर्खडकर, दादोबा पांडुरंग : (९ मे १८१४–१७ ऑक्टोबर १८८२). अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक. मुंबई येथे जन्म. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते. ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही दादोबांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा (सु. १८४८) या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग असे.
🔴 रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - इ.स. १८९२) हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला प्रगत राष्ट्राच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही. असे त्यांना तीव्रतेने वाटते. मराठीतून लेखन करणारे ते पहिले अर्थतज्ज्ञ होय. "लाक्षीज्ञान" या ग्रंथाद्वारे त्यांनी ऍडम स्मिथ प्रणित अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले.
🔴 डॉ. भाऊ दाजी लाड (१८२४-१८७४) : दैवज्ञ ब्राह्मण असणाऱ्या भाउंनी अनिष्ट सामाजिक रूढी आणि चालीरीतींना विरोध केला. स्त्री-शिक्षण, विधवाविवाह याबरोबरच त्यांनी मादक द्रव्यांच्या सेवनाविरूद्ध मोहीम सुरु केली. मुंबईचा पहिला गव्हर्नर माउंटस्तुअर्त एल्फिनस्तन याच्या कारकिर्दीत मुंबई वसवण्याच्या कार्यात पुढाकार घेतला.
🔴 विष्णूशास्त्री पंडित (१८२७-१८७६) : स्त्री-शिक्षण आणि विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते असणाऱ्या विष्णूशास्त्रींनी स्वतः एका विधवेशी विवाह करून एक नवा पायंडा पाडून दिला. याशिवाय आपल्या इंदुप्रकाश या वृत्तपत्रातून आधुनिक विचारांचा प्रसार केला.
🔴 महात्मा फुले ( जोतीराव गोविंदराव फुले १८२७-१८९०) : मराठी लेखक, विचारवंत, समाजसुधारक,शेतकरी व बहुजन समाज समस्या यांच्यासाठी झटणारे अशी ख्याती. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. विशाल दृष्टिकोणाचा क्रांतिकारक असल्याने १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली..नीती हाच मानवी जीवनाचा आधार असे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्व होते.१८५२ मध्ये पुणे लायब्ररीची स्थापना केली. विधवा विवाहास सहाय्य केले. बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवला. सार्वजनिक सत्यधर्म, दीनबंधू साप्ताहिक, गुलामगिरी ,ब्राह्मणांचे कसब असे काही ग्रंथ आणि लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत.
🔴 सावित्रीबाई फुले (१८३१-१८९७): मराठी शिक्षणप्रसारक आणि समाजसुधारक महिला म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी १८४७ मध्ये ज्योतिरावांची बहीण सगुणा हिला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. हि त्यांची पहिली शाळा. १८४८ मध्ये भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. तत्कालीन समाजाच्या विरोधाचा संघर्ष सहन करत त्यांनी शिक्षणप्रसारचा उपक्रम चालूच ठेवला. ज्योतिरावांच्या बालहत्या प्रतिबंधक गृहाची धुरा त्यांनी समर्थपणे चालवली. नाभिक समाजात लोकांचे प्रबोधन करून त्यांचे संप घडवणे , पुनर्विवाह कायदा यासाठी कामे केली. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बयाबापुड्याना सत्यशोधक कुटुंबात आश्रय दिला.
🔴 रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७-१९२५) : भांडारकरांनी आपले स्नेही न्या. माधवराव रानडे यांच्यासोबत प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्यांनी विधवा विवाह आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केल, एवढेच नव्हे तर स्वतःच्या विधवा कन्येचा पुनर्विवाह लावून दिला. भांडारकरांनी वैदिक ग्रंथ आणि पुराणांच्या आधारे समाजसुधारणा करण्याचे सर्वात मोठे कार्य केले.
🔴 न्यायमूर्ती रानडे (महादेव गोविंद रानडे १८४२-१९०१) : समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात.१८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष होते.मुंबई विद्यापीठात पहिले भारतीय फेलो म्हणून निवड. भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना. ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्था स्थापन करण्यात आणि त्यांचा विस्तार करण्यात सहभाग.
🔴 विष्णुशास्त्री चिपळूणकर (१८५०-१८८२) : एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस सर्वात प्रथम स्वदेशी, स्वभाषा, आणि स्वसंस्कृती यांचा पुरस्कार करणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर हे 'मराठी भाषेचे शिवाज म्हणून ओळखले जातात. परंतु मराठीसोबतच त्यांनी इंग्रजीचेही महत्त्व ओळखले होते. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यातील, 'न्यू इंग्लिश स्कूल' ची स्थापना करण्यात चिपळूणकरांचा मोलाचा वाटा होता.
🔴 गोपाळ गणेश आगरकर(१८५६-१८९५): व्यक्तिस्वातंत्र्य,बुद्धिवाद,भौतिकता या मूल्याच्या प्रचारात अग्रेसर. जातीव्यवस्था,चातुर्वर्ण्य,बालविवाह,ग्रंथप्रमाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना विरोध केला. केसरी,सुधारक हि वृत्तपत्रे काढली. बाळ गंगाधर टिळक आणि चिपळूणकर यांच्या सहयोगाने पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना..
🔴 लोकमान्य टिळक (बाळ गंगाधर टिळक-१८५६-१९२०) : भारतीय स्वातंत्र्यातील अग्रगण्य नेते.१८८० रोजी न्यू इंग्लिश स्कुल ची स्थापना केली.१८८३ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारली. १८८१ रोजी केसरी व मराठा वृत्तपत्रे सुरु केली. संस्कृत , गणित , खगोलशास्त्र यांचे मान्यताप्राप्त अभ्यासक होते.ओरायन,आर्क्टिक होम ऑफ वेदाज , गीतारहस्य या ग्रंथांचे लेखन केले.
🔴 महर्षी धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२): स्त्रीशिक्षण आणि सामाजिक सुधारणा यात अग्रेसर.भारतीय विद्यापीठातील डी. लिट.या पदवीने प्रथम सन्मानित.पदमविभूषण, भारतरत्न या सन्मानाने सन्मानित.१८९४ रोजी विधवा निवारण मंडळाची स्थापना.१र८९६ रोजी अनाथ बालिकाश्रम काढला. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना. १९१६ मध्ये या तिन्ही संस्थांचे एकत्रीकरण करून महर्षी कर्वे 'स्त्रीशिक्षण संस्था' स्थापन केली.कुशल मनुष्यबळ मिळावे म्हणून 'निष्काम कर्म मठ' ची स्थापना १९१० साली केली. पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
🔴 पंडिता रमाबाई (१८५८-१९२२) : स्त्री-शिक्षण आणि विधवाविवाहाचा पुरस्कार करणाऱ्या पंडिता रमाबाईंनी पुढे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. 'आर्य महिला समाज', 'शारदा सदन', 'मुक्तिसदन' या संस्थांची स्थापना करून पंडितां रमाबाईंनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी कार्य केले.
🔴 काशीबाई गोविंद कानिटकर ( १८६१-१९४८) : या लेखिका आणि स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. मराठी समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध साहित्याद्वारे आवाज उठवला. बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषेविषय शिकवत असत. पहिल्या भारतीय स्त्री.डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे चरित्र त्यांनी लिहिले.
🔴 रमाबाई रानडे(१८६३-१९२४) : स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळींच्या खंदया पुरस्कारत्या होत्या. स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी व व्यासपीठ निर्माण करण्यासाठी हिंदू लेडीज सोशल क्लब ची मुंबई मध्ये स्थापना केली. पुण्यातील सेवासदन या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले. पुण्यात मुलींसाठी हुजूरपागा शाळेची स्थापना केली. पुण्यातील येरवडा तुरुंगातील मानसिक रुग्णाच्य समस्येवर कार्य केले. स्त्री कैद्यांची सामूहिक प्रार्थना सुरु करून त्यांच्यात मनोधैर्य वाढवले. त्यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय महिला परिषदेचे पहिले अधिवेशन १९०४ साली मुंबईत भरले.
🔴 आनंदीबाई जोशी ( १८६५-१८८७): भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. तत्कालीन समाजाला महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून देण्यासाठी कलकत्यामध्ये एक भाषण केले.मी धर्मांतर करणार नाही हिंदुधर्म व संस्कृती यांचा त्याग करणार नाही हे ठणकावून सांगितले . भारतात महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले. एम. डी. साठी त्यांनी हिंदू आर्य लोकांमध्ये प्रसूतीशास्त्र हा प्रबंध सादर केला. व्हिक्टोरिया राणीकडून यांचे अभिनंदन झाले. भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला.
🔴 डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे: (१८७२-१९४८) : प्रसिद्ध भारतीय सेनानी . त्यांना हिंदू महासभेचे तेजस्वी नेता म्हटले जाते. १९२७-२८ मधील अखिल भरतोय हिंदू महसभेचे अध्यक्ष होते. भारतीय सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक , समाजसुधारक व निष्णात नेत्रविशारद होते. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेवर संशोधन करून "नेत्रचिकित्सा" हा ग्रंथ लिहिला. तो अत्यंत उपयुक्त मानला जातो.अस्पृश्यता विरोधात त्याकाळी जे समाजप्रबोधन केले. त्याबद्दल त्यांना शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांनी धर्म वीर पदवी दिली. त्यांनी नाशिक भोसला मिलिटरी स्कुलची स्थापना केली.
🔴 छत्रपती शाहू महाराज (१८७४-१९२२) :बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले . अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्यात बंदी घातली. १९१७ साली पुनर्विवाह कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. १९१६ साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन संस्था स्थापन केली. पुस्तकांचे लेखन केले.
🔴 रघुनाथ धोंडो कर्वे (१८८२-१९५३) : संतती नियमन आणि समाज स्वास्थ यावर भरपूर लेखन. संतती नियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक. १९२७ ते १९५३ पर्यंत समाज स्वास्थ हे मासिक निष्ठेने , निग्रहाने चालवले.आधुनिक आहारशास्त्र,आधुनिक कामशास्त्र, त्वचेची निगा , गुप्तरोगा पासून बचाव,वेश्याव्यवसाय, संतती नियमन-आचार व विचार अश्या सर्व अंगानी लेखन केले.
🔴 स्वा. सावरकर (१८८३-१९६६) : मराठी भाषेतील लेखक व कवी होते. भारतीय स्वातंत्रलढ्यातील एक क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्रपूर्व व स्वातंत्रोत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदू संघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ.विज्ञानाचा पुरस्कार ,जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी या चळवळीचे प्रणेते.प्रतिभावन्त साहित्यिक व प्रचारक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला होत.
🔴 भाऊसाहेब पायगोंडा पाटील (१८८७-१९५९) : यांना महाराष्ट्राचे बुकर "टी वॉशिग्टन" असे म्हटले जाते. त्यांना गाडगेबाबांनी कर्मवीर हि पदवी दिली. ग्रामीण शिक्षणप्रसारसाठी संपूर्ण आयुष्य वाहणारा द्रष्टा समाजसुधारक. १९१९ कऱ्हाड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. १९१० मध्ये स्थानिक लोकांच्या मदतीने दुधगांव विद्यार्थी प्रसारक मंडळाची स्थापना केली. १९३२ मध्ये मुलींसाठी "union boarding house" ची स्थापना केली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्युकेशन फंड स्थापना केली. ते समताधिष्टीत समाजनिर्मितीचे प्रयत्न करणारे समाजसुधारक होते.
🔴 ताराबाई मोडक (१८९२-१९७३) : 'शिशुविहार' या बालशिक्षण संस्थेची मुंबईत स्थापना करून त्याद्वारे मुलींना मोफत शिक्षण देण्याचे कार्य चालवले. याशिवाय ठाणे जिल्ह्यातील बोर्डी जवळील कोसबाड या गावी आदिवासी मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठीही कार्य सुरु ठेवले.
🔴 डॉ. केशव बळीराम हेडगेवार (१८८९-१९४०) : असहकार चळवळ आणि कायदेभंग आंदोलनात भाग घेणाऱ्या डॉ. हेडगेवारांनी स्वा. सावरकरांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन हिंदूंचे संघटन करण्यासाठी १९२५ साली 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. याच 'रा. स्व. संघाच्या' मधुकरराव देवलांसारख्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यात सावकारांकडे गहाण पडलेल्या दलितांच्या शेतजमिनी सोडवल्या आणि म्हैसाळ या गावी 'श्री. विठ्ठल संयुक्त सहकारी सहेतु सोसायटी' ची स्थापना केली, ज्याच्या आधारे अनेक दलित कुटुंबे आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभी राहिली.
🔴 डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६): भारतीय कायदेतज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते. १९९० साली भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले गेले. कायदा ,अर्थशास्त्र, आणि राज्यशास्त्र यातील अभ्यास व संशोधन यासाठी कोलंबिया विद्यापीठ व लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक येथून पदव्या मिळवल्या. १९२७ रोजी महाड येथे चवदार तळे याचा सत्याग्रह केला. १९२० साली "मूकनायक" हे वृत्तपत्र सुरु केले. मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी "बहिष्कृत हितकारिणी" सभा सुरु केली.
🔴 विनायक नरहरी भावे(१८९५-१९८२): भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते.महात्मा गांधींनी १९४० मध्ये वैयक्तिक सत्याग्रह पुकारला त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. समाज नेतृत्वासाठो दिल्या गेलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराचे पहिले मानकरी. भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला.
🔴 देशमुख (भाऊसाहेब देशमुख (कदम) - १८९८-१९६५): १९३५ नंतर शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. स्वतंत्र भारतात कृषिमंत्री म्हणून काम केले. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री.शिवाजी शिक्षण संस्था काढली. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी,पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय असे अनेक महाविद्यालये सुरु केली. वैदिक वाड्.मयातील धर्माचा उदगम व विकास या प्रबंधा बद्दल डॉक्टरेट.कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा. हिंदुस्तानात कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.
🔴 सानेगुरुजी (१८९९-१९५०) : थोर गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, लेखक वा कवी असणारे साने गुरुजी हे समाजसुधारकही होते. सामाजिक समता आणि विविध धर्माच्या ऐक्याची विचारसरणी रुजवली. पंढरपुरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे म्हणून साने गुरुजींनी बेमुदत उपोषण केले, आणि अखेरीस मंदिर दलितांना खुले झाले.आधुनिक विचारांचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी 'साधना' या साप्ताहिकाची निर्मिती केली.
🔴 गोळवलकर गुरुजी :(माधव सदाशिव गोळवलकर १९०६-१९७३): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंचालक . बनारस हिंदू विश्वविद्यालय मध्ये निदर्शक म्हणून काम केले.त्यांची तत्वप्रणाली विवेकानंद तत्वप्रणलीशी सुसंगत होती. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सहभाग. देश विभाजनाविरुद्ध जनतेला कडवे आव्हान केले.
🔴 बाबा आमटे ( मुरलीधर देविदास आमटे- १९१४- २००८) : भारतातील प्रमुख आणि सन्माननीय समाजसेवी होते. समाज परित्यक्त आणि कुष्ठ रोगी यांसाठी आश्रम स्थापन केले.यापैकी आनंदवन हे एक होय. वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलनातही ते प्रमुख होते. १९८५ मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत भारत जोडो आंदोलन ही त्यांनी चालवले.
🔴 एकनाथजी रानडे (१९१४-१९८२): भारतातील सामाजिक व अध्यात्मिक चळवळीतील एक खंदे कार्यकर्ते होते. ते आपल्या सँघटनात्मक कार्यासाठी नावाजलेले होते. १९५६-१९६२ या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिव होते. विवेकानंदशिला स्मारकाच्या बांधकामात स्वतःला झोकून दिले. व त्याचे काम पूर्ण केले.१९४५ मध्ये जबलपूर येथील सागर विद्यापीठातून एल.एल.बी. उत्तीर्ण केली.
🔴 पांडुरंगशास्त्री आठवले (१९२० - ) : संस्कृत भाषेचे पंडितम आणि धर्मविद्वान असणाऱ्या आठवले यांनी स्वाध्याय आंदोलनाची उभारणी करून गुजरात-महाराष्ट्र आणि कोकणपट्टी कोळी समाजाला संघटीत केले आणि त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग शिकवला. आठवले यांच्या आधुनिक समाज कार्याबद्दल त्यांना टेंपलटन पुरस्कार आणि 'रेमन म्यागसेसे' या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
🔴 विलासराव साळुंखे (१९३७- २००२): भूमिहीन मजुराला देखील पाण्याचे समान वाटप व्हावे या मागणीसाठी 30 वर्षे लढा देणारे तसेच पाणी या संकल्पनेने सामूहिक व्यवस्थापनाद्वारे पाण्याची साठवण व वितरण करून शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास घडवणारे सामाजिक कार्यकर्ते .पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील पाणलोट क्षेत्रविकास व त्याआधारे शेतीसिंचन हा प्रयोग विलक्षण गाजला.
🔴 किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे (जून १५, इ.स. १९३७: भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - हयात). मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे, किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत. १९९० साली त्यांना त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. या नंतर अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे. या आंदोलनामुळे सरकारला सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार देण्याचा कायदा लवकर संमत करावा लागला. अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने करून जनजागृतीची कामे केली आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.
🔴 डॉ. अनिल अवचट (१९४४ - ) : आपल्या माणस या पुस्तकातून त्यांनी देवदासी प्रथा आणि भटक्या विमुक्त समाजाबद्दलच्या व्यथा मांडून समाजाच्या प्रबोधनाचे कार्य केले.
🔴 सिंधुताई सपकाळ (१९४७) : अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या मराठी भाषिक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. २०१० मध्ये स्त्री व बालकल्याण क्षेत्रातील सामजिक कार्यकर्त्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार दिला गेला. २५८ राष्ट्रीय व काही आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित. त्यांनी आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत अनाथ मुलांना संभाळण्याचे समाज कार्य आज हि चालू ठेवले आहे.
🔴 विकास आमटे (१९४७) : मी बाबांच्या स्वप्नाचा ठेकेदार आहे. अशी स्वतःची ओळख सांगत आनंदवनाचे काम पुढे चालवत आहेत. एक जेष्ठ जलतज्ञ म्हणून त्यांचा मोठा अभ्यास आहे. बागायतीचे त्यांचे ज्ञान थक्क करून सोडणारे आहे. बाबा आमटे सोमनाथला गेल्यापासून कुष्ठरोग्यांपासून आनंदवनातील पानाफुलांची काळजी घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विकास आमटे होय. यांच्या प्रयत्नामुळे आनंदवन हि एकमेव संस्थेचे रूपांतर ग्रामपंचायतीत झाले आहे.
🔴 प्रकाश आमटे ( प्रकाश मुरलीधर आमटे-१९४८):प्रकाश आमटे हे समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र. पत्नी डॉ.मंदाकिनी आमटे हिच्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातील भाररागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी व वन्यपशूंसाठी दवाखाना चालवतात. १९८४ मध्ये आदिवासी सेवक पुरस्कार,२००२ मध्ये पद्मश्री पुरस्कार, २००८ मध्ये मॅगसेसे पुरस्कार, २०१२ मध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार, २०१४ मध्ये मदर तेरेसा पुरस्कार...अशा विविध पुरस्कारांनी सन्मानि
🔴 अभय बंग (१९५०) : मराठी डॉक्टर. सर्च या संस्थेमार्फत गडचिरोली मध्ये ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा व संशोधन कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारता सोबतच पाकिस्तान ,नेपाळ, बांगलादेश व अनेक आफ्रिकन देश प्रतिरूप म्हणून वापरतात. गडचिरोलीत दारूबंदी चळवळ, स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरील संशोधन,सिकल सेल अनिमियावरील संशोधन असे भारीव कार्य केले. यांनी ब्रेथ काउंटर या उपकरणाचा शोध लावला.
🔴 पोपटराव पवार (१९६०): आदर्श गाव संकल्पनेचे प्रणेते.हिवरेबाजार गावाचा कायापालट केला. शेतीसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी, जनावरांना चारा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा, रस्ते,बीज,नोकरी-धंदा, सोशल कलचरल,या मुद्दयांद्वारे १९९०-९५ पर्यंत योजनापूर्वक केलेल्या आखणीतून हिवरेबाजार गावाचा कायापालट केला. हिवरेबाजार गाव आणि पोपटराव हे जणू समीकरणच बनले.
🔴 राणी बंग : स्त्रीरोग शास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी आदिवासी स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या व त्यांच्या भावविश्वाचा वेध घेणारी कानोसा आणि गोईण हि पुस्तके लिहिली. त्याना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .माँ दन्तेश्वरी रुग्णालयाची स्थापना केली. वसा आणि अमिझी या गावात प्रत्येक स्त्रीला तपासलं आणि स्त्रियांच्या आरोग्याबद्दल संशोधन केले. अशिक्षित स्त्रियांना आरोग्य सेवेचे प्रशिक्षण "दाई आणि आरोग्यदूत" या मार्फत देण्यात येते. याची सर्व सूत्र डॉ. राणी बंग सांभाळतात.
|| ज्ञानभाषा मराठी ||
|| माझी शाळा📚माझी भाषा ||
⏩ पुढे पाठवा ⏩